नागपूर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय म्हणजे अभूतपूर्व यश आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळालेल्या बहुमतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, निवडणुकांचे हाती आलेले निकाल बघता देशातील कुठल्याही राज्यातील सामान्य नागरिक हे मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या गोष्टी आणि मुद्द्यांवर भाजपविरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्य केलं. मोदींनी केलेल्या विकासाच्या आणि विश्वासाच्या राजकारणामुळेच गुजरात मध्ये भाजपच्या बाजूने 49.9 टक्के मतदान झाले. हा अभूतपूर्व विजय असून, मी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं आणि नागरिकांचं अभिनंदन करतो. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रे अध्यक्ष अमित शहा याना शुभेच्छा देतो. असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करत राहणार आहे. देशातील प्रत्येक घटकांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील. प्रत्येक राज्यातील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवतील. यापुढेही भाजपची विजयाची घोडदौड अश्याचप्रकारे कायम राहील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.