Published On : Mon, May 22nd, 2017

चिंचोली पठार लघूसिंचन तलावातून 10 हजार घनमिटर गाळ काढला

Advertisement

•गाळमुक्त तलाव योजनेला शेतकऱ्यांच्या प्रतिसाद
•गाळ काढल्याने 10 टिसीएम अतिरिक्त जलसाठा
•सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शुभारंभ


नागपूर :
गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत हिंगणा तालुक्यातील चिंचोली पठार तलावातून सुमारे 10 हजार घनमिटर गाळ लोकसहभागातून काढून शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाला.

हिंगणा तालुक्यातील चिंचोली पठार येथे लघू सिंचन विभागातर्फे 1986 मध्ये तलाव बांधण्यात आला होता. परंतू गाळाने भरल्यामुळे तसेच तलावातून मोठया प्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाली होती. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विमोचक विशेष दुरुस्ती करुन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाला. या तलावातून या परिसराचे सुमारे 25 शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध होणार असून याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये एवढी आहे.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, उपविभागीय महसूल अधिकारी भाऊसाहेब कोळेकर, गट विकास अधिकारी एम.बी जुआरे, संजय वानखडे, जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई पाल, पंचायत समिती सदस्य राजेंद्र वाघ, कार्यकारी अभियंता एन. डी. सहारे, उपअभियंता जी.के.राव, श्री. सयाम, तहसलिदार प्रताप वाघाडे, आदी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

गाळमुक्त तलाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतात तलावातील गाळ टाकल्यास उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार असल्याचे सांगतांना डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे तलावाचे खोलीकरण होणार आहे. यामुळे सिंचन वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध होत असला तरी त्यांना स्वखर्चाने हा गाळ शेतात टाकावा लागणार आहे.


चिंचोली पठार हा तलाव वनक्षेत्रामध्ये येत असून उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना व वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. सभोवतालच्या विहीरींचे पाणी 15 ते 16 मिटरने वाढेल. या लघूसिंचन तलावाचा पाणीसाठा 500 टीएमसी असून सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल. या तलावातून 10 हजार घनमिटर गाळ काढण्यात आल्यामुळे 10 टिएमसी अतिरिक्त पाणी साठणार आहे. तलावाच्या विसर्गातून पाणी बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विमोचकाचे दुरुस्ती आवश्यक असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानामुळे 17 लक्ष रुपये खर्च करुन नविन विहिरीसह पाणी सोडण्याची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तलावामध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त पाणी सोडण्यास मदत होणार आहे.