पाणीपुरवठा विभागात चिरीमिरी घेतल्याशिवाय टेंडर मंजूर होत नाही – अजित पवार यांचा खळबळजनक आरोप

Advertisement

Ajit Pawar
नागपूर: राज्यातील भाजप आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केला जात नाही परंतु याचा अर्थ असा नव्हे की सारे काही आलबेल सुरु आहे.असे काहीही घडत नसून कोणी कितीही नाही म्हटले तरी पाणीपुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडरच मंजूर होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.

विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव या भागातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबतचा मुद्दा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. त्यावेळी सदरचे काम चार-पाच महिने झाले तरी त्याला सुरुवात करण्यात आले नसल्याचा उल्लेख खडसे यांनी केला. त्यावेळी अजित पवार यांनी हाच धागा पकडत पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत चिरीमिरी घेतल्याचा आरोप केला.

दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आगामी १५ दिवसामध्ये याबाबत चौकशी करुन काम सुरु करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले.

लोणीकर यांच्या उत्तरात दिरंगाई दिसत असल्याचे अजित पवार यांनी सरकारच्या कामकाज पध्दतीवर हल्ला चढविला.सत्ताधारी बाकावरील सर्व आमदार जाणीपूर्वक शांत बसले आहेत.बोलण्यास त्यांची अडचण होत आहे. मात्र पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने नाथाभाऊ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून १५ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र इतर आमदारांच्या कामांचे काय ? असा सवाल करत त्या विभागात चिरीमिरी देत असल्याचा आरोप केला.

या आरोपावर मंत्री लोणीकर हे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले होते मात्र लोणीकर यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.फक्त दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.