Published On : Wed, May 24th, 2017

अंतःप्रेरणेतून घनकचरा व्यवस्थापनात सहभागी होऊ

Advertisement
Solid-Waste

Representational Pic


नागपूर
: केंद्र सरकारने 5 जून या जागतिक पर्यावरण दिवसापासून ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच संकलित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नागपूर महानगरपालिकेचा मात्र 1 जून पासूनच घनकचरा व्यवस्थापनाची हि मोहीम शहरात राबविण्याचा मानस आहे, याच पार्श्वभूमीवर महाल येथील नगर भवनात मंगळवारी मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची बैठक पार पडली, बैठकीत सर्व मुख्याध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्याची शपथ घेतली.

अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जयंत दांडेगावकर, शिक्षण अधिकारी फारुक अहमद, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुवैद्यक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ . सोनवणे म्हणाले, मनपाचे एक हजारपेक्षा जास्त शिक्षक आहेत, प्रत्येक शिक्षकाने त्यांच्या शाळेजवळील 600 कुटुंबाना जरी भेट दिली आणि ओला व सुका कचरा वेगवेगळ्या हिरव्या व निळया कचरापेटीत का भरायचा याबाबत जनजागृती केली तरी हे अभियान यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. प्रत्येक शिक्षकाला फक्त 10 मिनिटे द्यायची आहेत. आजही समाजात शिक्षकांच्या शब्दाला मान दिला जातो. कोणतेही अभियान शिक्षक प्रभावीपणे यशस्वी करू शकतात. याबाबत अधिक सखोल माहितीसाठी शुक्रवार 26 मे 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल हे स्वच्छ भारत अभियानाबाबत शिक्षकांना संबोधित करणार आहे.

प्रारंभी जयंत दांडेगावकर यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत सादरीकरण केले. निर्मित होणारा कचरा त्याच ठिकाणी विलग करून प्रक्रियेसाठी पाठवणे हे नागरिक म्हणून प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला देशाच्या पुढे राहायचे आहे. या आवाहनाला शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. नागपूरच्या रणरणत्या उन्हातही सभागृह भरगच्च भरले होते हे विशेष!! आभार फारुक अहमद यांनी मानले.