Published On : Fri, Aug 18th, 2017

मिरा-भाईंदरमधल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; रविवारी मतदान, प्रमुख पक्षांमध्येच लढत

Advertisement

मुंबई: मिरा-भाईंदरमधल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह बविआ सारख्या स्थानिक पक्षात टक्कर आहे. रविवारी 20 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा
मिरा भाईंदरमध्ये सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 24 प्रभागातल्या 95 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 21 ऑगस्टला लागणार आहे. मिरा-भाईंदरच्या निवडणुकीत भाजपने एकूण 95 पैकी 93 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यात 57 उमेदवार हे गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असून उरलेले सगळे मराठी उमेदवार आहेत. विशेष म्हणजे भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेतून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे.

अनेक उमेदवारांवर गुन्हे दाखल
भाजपच्या 25 उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शिवसेनेचे हरीश अग्रवाल हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 67 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 22 उमेदवार अशिक्षित असून 117 उमेदवार फक्त दहावी पास आहेत.

मतदार यादीत घोळ
निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड असले तरी भाजपनेही तगड्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात बविआ सारखे स्थानिक पक्ष काय कामगिरी करतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे, मिरा भाईंदर निवडणुकीतील मतदार यादीत घोळ असून भाजप खोट्या मतदारांच्या जीवावर सत्ता आणणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.